उल्लास साक्षरता उपक्रमातून बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण 

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या योजल्या जात आहेत. त्यानुसार सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा शासनाचा मानस आहे. 

उल्लास साक्षरता उपक्रमातून बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (Ulas Nav Bharat Literacy Programme) हा केंद्र सरकारचा महत्त्वकांशी कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीत देशभर राबवला जाणार आहे. त्यानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या योजल्या जात आहेत. त्यानुसार सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण (Extra points for participating students) देण्याचा शासनाचा मानस आहे. 

स्वयंसेवक म्हणून इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एनसीसी, एनएसएस, अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक, शिक्षक यांनी सहभाग नोंदवणी अपेक्षित आहे. या योजनेत शाळा हे एकक असून स्वयंसेवक शिक्षकास कोणत्याही मानधनाची तरतूद नाही. लोकसहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढविणे आवश्यक आहे. चालू वर्षीची असाक्षर ऑनलाइन नोंदणी व त्यापुढील कार्यवाही सुरू आहे.त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकांमध्ये याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय मंडळांना संचालकांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून मिळवलेले अतिरिक्त गुण दहावी-बारावीच्या एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जावेत,असा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार आहे. 

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्यात आता शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी झाल्यास अतिरिक्त गुण मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेत स्वयंसेवक म्हणून कामकाज करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांची तरतूद करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश तत्कालिन शिक्षण मंत्री यांनी दिले होते. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थांना अतिरिक्त गुण देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढवण्यासाठी आणि कामकाज प्रभावीपणे पार पडण्यासाठी उल्लास  साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी आता विभागीय मंडळावरही देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राजेश क्षीरसागर यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले आहेत.

या कार्यक्रमासाठी शासन निर्णयाद्वारे राज्य, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या योजनेत असाक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण, त्यांची उल्लास ॲपवर ऑनलाइन नोंदणी व जोडणी, अध्ययन अध्यापन, परीक्षेचा सराव, परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रिय स्तरावरील जिल्हा, तालुका, शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो.