रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

स्थलांतरित केलेल्या महाविद्यालयामध्ये दाखले उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठाने मार्ग काढावा.

रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या रत्नदीप महाविद्यालयातील (Ratnadeep College)विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)ठिय्या आंदोलन केले. रत्नदीप कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांना दाखले देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students)होत आहे. स्थलांतरित केलेल्या महाविद्यालयामध्ये दाखले उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठाने मार्ग काढावा, या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी (Students and parents) विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर (Pro-Vice Chancellor Dr. Parag Kalkar)यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांना शारीरिक,मानसिक, आर्थिक त्रास देणाऱ्या रत्नदीप कॉलेजच्या संस्थाचालका विरोधात विविध विद्यार्थी संघटना व राजकीय प्रतिनिधी उभे राहिले होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. जिल्हा प्रशासनाने संबंधित महाविद्यालयाचे संलग्नता रद्द करण्यासंदर्भात शासनाकडे शिफारस केली होती. परंतु, याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी अनेक विद्यार्थी हा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठात दाखल झाले. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी यात पुढाकार घेत व प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांचा परीक्षेचा प्रश्न व कागदपत्रांचा प्रश्न कसा सोडवता येईल, यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा केली.

विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना कागदपत्र उपलब्ध करून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची भावना विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी कागदपत्र मागण्यासाठी महाविद्यालयात गेले असतात. त्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडवून ठेवले जाते, असा आरोप काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन यातून काय मार्ग काढण्यासाठी काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

-------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्र देण्यास रत्नदीप कॉलेज प्रशासन टाळाटाळ करत आहे. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले होते. महाविद्यालय विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यातील वाद न्यायालयात गेलेला आहे. परंतु, न्यायालयात पुनर्रयाचिका दाखल करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यास युवासेना कटिबद्ध आहे. शुक्रवारी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्याशी विद्यार्थी प्रश्नाबाबत संवाद साधला. त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा केली.  विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत कोणत्याही अडचणी येऊ येणार नाहीत, त्यांचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्र मिळण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. 

- कल्पेश यादव, सहसचिव , युवासेना, 

-------