कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू; विद्यार्थ्यांचे आंदोलन
मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई आहे. अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे शॉकचा फटका अधिक तीव्रतेने बसला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर चैतन्यला उपचारासाठी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयातून (Pune College of Agriculture) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Student's Death) झाल्याची घटना महाविद्यालयात घडली आहे. मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना इलेक्ट्रीकल शॉक (Electric shock) लागल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. तेव्हापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्याची अखेर प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चैतन्य पुंडलिक चव्हाण (Chaitanya Chavan, Student) (वय २३ वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असून, पुण्यातील कृषी महाविद्यालयात 'एमबीए' च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
मृत्य विद्यार्थी चैतन्यचा मित्र अक्षय सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरपाशी गेला होता. वॉटर कुलर नीट थंड होत नसल्याने चैतन्यने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये लावली. मात्र, नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिकटला. मागून मदतीला धावलेल्या मुलालाही काही करता आले नाही. अखेर वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला आणि शुद्ध हरपली.

मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई आहे. अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे शॉकचा फटका अधिक तीव्रतेने बसला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर चैतन्यला उपचारासाठी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शॉकमुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.