अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी कागदपत्रे तयार ठेवण्याचे शिक्षण विभागाकडून आवाहन

गेल्या वर्षी पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली. त्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली होती. या अनुषंगाने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी कागदपत्रे तयार ठेवण्याचे शिक्षण विभागाकडून आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा (10th and 12th Examinations) नुकत्याच संपल्या आहेत. मात्र, लगेच शैक्षणिक वर्षे २०२६-२७ (Academic Year 2026-27) साठी शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची (11th Online Admission Process) तयारी सुरू केली आहे. ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विद्यार्थी आणि पालकांना आतापासून आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व कागदपत्र तयार ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून  (Appeal to Keep Documents Ready) करण्यात आले आहे. 

गेल्या वर्षी पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली. त्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली होती.
या अनुषंगाने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. याबाबत डॉ. पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांची प्रतीक्षा करावी लागली होती. यांसारख्या उद्भवणाऱ्या समस्यांमुळे यंदा मात्र शिक्षण विभागाने सावध पावित्रा घेतल्याचे दिसून विद्यार्थ्यांना अधिच कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 

अकरावी प्रवेशाच्याआवश्यक कागदपत्रांमध्ये दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांसाठी महिला आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात. ही सर्व कागदपत्रे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापुर्वीच विद्यार्थ्यांनी काढून ठेवावीत, ज्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.