एनएनएसच्या माध्यमातून तरुणाईला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी : राजेश पांडे 

देशाच्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विश्वगुरू म्हणून जगासमोर घेऊन येतील.

एनएनएसच्या माध्यमातून तरुणाईला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी : राजेश पांडे 
Rajesh Pande

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत (NSS) राज्यभरातील तरुणाईला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. त्या आधारे तरुणांमध्ये आपल्या भविष्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी ही योजना निश्चितपणे वापरतील," असा विश्वास राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य समितीचे सल्लागार राजेश पांडे (Rajesh Pande ) यांनी शनिवारी व्यक्त केला. 

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये पांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी  पद्मश्री   पोपटराव पवार, पद्मश्री मिलिंद कांबळे, 'तेर पॉलिसी'च्या विनिता आपटे, 'भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान'चे डॉ. प्रसाद  देवधर, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सिनेट सदस्य राहुल पाखरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते. 

पांडे म्हणाले, "योजनेचा सल्लागार म्हणून राज्यातील 'एनएसएस'ला नवे रुप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे अधिवेशन आणि त्याआधारे राज्यभरात ४० लाख युवकांशी होणारा सकारात्मक युवा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. देशाच्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते देशाला विश्वगुरू म्हणून जगासमोर घेऊन येतील. त्यासाठी राज्यभरातील युवक सक्षम होण्यासाठी हे अधिवेशन उपयुक्त ठरेल," असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला.