शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिका भरवणार 'सिग्नल शाळा',
चेंबूर परिसरात अमर महाल येथे जोड मार्ग सांताक्रूझ-चेंबूर उड्डाणपुलाखाली सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सिग्नल शाळा ही संकल्पना ठाणे आणि नेरूळ मध्ये समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने राबवली आहे. आता मुंबईत चेंबूर येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बेघर, स्थलांतरीत तसेच इतर काही कारणांसाठी शिक्षणापासून दूर असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना (Out-of-school students) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 'सिग्नल शाळा' (Signal School) भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणांना अंगीकारत सुरू झालेला हा प्रयोग भारतासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawade) यांनी व्यक्त केला आहे.
चेंबूर परिसरात अमर महाल येथे जोड मार्ग सांताक्रूझ-चेंबूर उड्डाणपुलाखाली सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सिग्नल शाळा ही संकल्पना ठाणे आणि नेरूळ मध्ये समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने राबवली आहे. आता मुंबईत चेंबूर येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
उदरनिर्वाहाच्या शोधासाठी महानगरांकडे काही वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेले भटके विमुक्त कुटुंब, विविध उड्डाणपुले, पदपथांवर निवास करत असतात. अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनही प्रयत्न करीत आहे. मुख्य प्रवाहातील शाळा अशा मुलांसाठी लवचिक नसल्याने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक अनुशेषावर काम करण्याचे प्रयत्न समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने सिग्नल शाळेच्या माध्यमातून केले आहे.
यामुळे अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. काही उच्च शिक्षण घेऊन रोजगारक्षम झाली. ठाण्याच्या धर्तीवर मुंबईत देखील सिग्नल शाळा उभी रहावी यासाठी जिल्हा नियोजन निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातून वर्ग भरवण्यासाठी कंटेनर व इतर साहित्य आदी उपलब्ध करुन घेतले. त्यामुळे ही शाळा उभी राहू शकली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी दिली.