11th Admission: अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आता 30 जूनला; प्रवेशासाठी पुन्हा तारीख पे तारीख

आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार आहे.त्यात 30 जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले जाणार आहे. परंतु, 30 जून ही तारीख तरी पाळता येणार आहे का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

11th Admission: अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आता 30 जूनला; प्रवेशासाठी पुन्हा तारीख पे तारीख

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

11th Admission: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (Class XI Online Admission Process)पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत अडकली आहे.ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये महाविद्यालयाचा कटऑफ दिसत नसल्यामुळे प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी (First merit list for admission) 27 जून रोजी जाहीर होणार नाही. तर त्यासाठी 30 जून उजाडू शकते, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक (Revised schedule for admission process)लवकरच जाहीर केले जाणार आहे, असे राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील (Office of the State Director of Secondary Education) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ४० जागा उपलब्ध असून प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी संस्था निहाय कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा यासाठी ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. त्यामुळे आता २० लाखांपेक्षा अधिक जागांसाठी उर्वरित १२ लाख विद्यार्थ्यांची या निवड यादी प्रसिध्द करणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार 27 जून पासून कॉलेज निहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना 27 जून पासून आपल्याला प्रवेश मिळेल असे वाटत होते.पण कोणाचीही मागणी नसताना आणि अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाईन प्रक्रिया राबवणे सोपे नसताना शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. 

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला. तरीही अद्याप अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली नाही.त्यामुळे प्रवेशाचा हा सावळा गोंधळ आणखी किती दिवस सुरू राहणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एकही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.त्यामुळे प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या एजन्सीला ऑनलाईन प्रक्रिया राबवणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होते.त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार आहे.त्यात 30 जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले जाणार आहे. परंतु, 30 जून ही तारीख तरी पाळता येणार आहे का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.