मराठीचा वापर दैनंदिन जीवनात झाला पाहिजे - रामदास फुटाणे
आगामी अर्थसंकल्पात भाषेसाठी निधीची तरतूद करण्याचे काम करण्यात येईल असे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठांमध्ये भाषेचे शिक्षण (Language learning) दिले जाते पण त्याचा वापर प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात झाला पाहिजे. इंग्रजी भाषा (English language) आपल्याला टाळता येत नाही पण मराठी भाषा (Marathi language) आपल्याला विसरता येणार नाही ती जिवंत ठेवण्याचे काम आगामी काळात करावे लागेल,असे मत ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे (Ramdas Phutane) यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir in Pune) येथे पुणे पुस्तक महोत्सवतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी फुटाणे बोलत होते.या प्रसंगी केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख,माजी खासदार प्रदीप रावत, राजीव तांबे, अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रवीण तरडे, धीरज घाटे, दीपक मानकर, किरण साळी, राजीव बर्वे, सुनील महाजन, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे.आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल.पुढील काळात आपली परीक्षा असून अभिजात भाषा टिकवण्याच्या दृष्टीने आपणास प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी अर्थसंकल्पात भाषेसाठी निधीची तरतूद करण्याचे काम करण्यात येईल.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, प्रगत भाषेला निधी देण्याची तरतूद करण्यात यावी.राज्य शासन त्याला पाठबळ आगामी काळात देईल. प्रत्येक भाषेचे सेंटर ऑफ एक्सेलंस तयार करून त्यात मनुष्यबळ उपलब्ध करावे. देशात 50 पेक्षा अधिक केद्रिय विद्यापीठ आहे, त्याठिकाणी आपल्या भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे.अभिजात भाषा दर्जा दिल्याने मराठी भाषा प्राचीन आणि कोणत्या दुसऱ्या भाषेतून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे.
पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी म्हणाले, मराठी भाषा भवन विद्यापीठ मध्ये राबविण्यात येत आहे. एक हजार पुस्तके मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संशोधन दृष्टीने ते पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
राजेश पांडे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे शहराचे साहित्य, भाषा यावर मोठे प्रेम असल्याचे पुस्तक मोहत्सव मधून दिसून आले आहे. अनेकजणांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. अनेक वर्षानंतर स्वप्नं सत्यातले असून आज आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमाचे संवाद पूनेचे सुनील महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.