आश्रमशाळांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; आदिवासी मंत्र्यांनी भरला दम..
आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांसोबत दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. विद्यार्थी स्पर्धेत टिकावेत यादृष्टीने अध्यापन झाले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना दिला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आदिवासी आश्रमशाळांमध्ये (Tribal Ashram School) विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांसोबत दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. विद्यार्थी स्पर्धेत टिकावेत यादृष्टीने अध्यापन झाले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके (Dr. Ashok Uike) यांनी अधिकाऱ्यांना दिला. जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री उईके यांनी अहेरी येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प (Integrated Tribal Project) कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत मंत्री उईके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, असा संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. राज्यातील आश्रम शाळेत रोज काही ना काही घटना समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होताना दिसून आल्यानंतर सरकारने याकडे लक्ष केंद्रीत केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री यांच्या विभागामार्फत बैठकीचे आयोजन केले होते.
डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वसतिगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल, यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी. ही समिती नियमित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.