IAS प्रशिक्षण केंद्रांची चौकशी; दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अंगलट

२०२२ मध्ये UPSC अंतिम निकालानंतर एकूण ९३३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. परंतु, २० संस्थांनी दावा केल्यानुसार शिफारशींपेक्षा हा आकडा खूप मोठा होता, असे खरे यांनी सांगितले.

IAS प्रशिक्षण केंद्रांची चौकशी; दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अंगलट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षांची तयारी करण्यासाठी देशभरातील अनेक विद्यार्थी नवी दिल्लीतील खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये (IAS Coaching Centre) प्रवेश घेतात. मात्र, या प्रशिक्षण केंद्रांकडून दिशाभूल केली जात असल्याचा ठपका ग्राहक संरक्षण नियामक प्राधिकरणाने (CCPA) ठेवला आहे. दिल्लीतील २० IAS कोचिंग सेंटर्सची कथित दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि टॉपर्स आणि यशस्वी उमेदवारांची नावे आणि चित्रे वापरून संभाव्य इच्छुकांवर प्रभाव टाकण्याच्या अनुचित पद्धतींची चौकशी सुरू असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

 

प्रसारमाध्यमांना माहिती देताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) अध्यक्ष निधी खरे यांनी सांगितले की, २० संस्थांपैकी केंद्रांवर प्रत्येकी  एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. "गेल्या दीड वर्षात यशस्वी विद्यार्थ्यांची महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आम्ही चार केंद्रांवर दंड ठोठावला आहे, तर इतर प्रकरणांची चौकशी सुरू आहे," असे खरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, बलात्काराच्या घटनेनंतर कोटामध्ये आता अंमली पदार्थांचे जाळे उघड

 

सहसा, UPSC (Union Public Service Commission) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक कोचिंग संस्था जाहिराती करतात. दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी सरासरी ९०० विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण होतात. २०२२ मध्ये UPSC अंतिम निकालानंतर एकूण ९३३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. परंतु, २० संस्थांनी दावा केल्यानुसार शिफारशींपेक्षा हा आकडा खूप मोठा होता, असे खरे यांनी सांगितले.

 

अनेक कोचिंग संस्था महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून समान रँकधारक त्यांचा विद्यार्थी असल्याचा दावा करतात. यशस्वी उमेदवाराने वेगवेगळ्या विषयांसाठी आणि पुर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षांसाठी अनेक संस्थांमध्ये कोचिंग घेतले असतात. पण संस्थेमध्ये कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे हे ते स्पष्टपणे उघड करत नाहीत. काही जणांनी केवळ मोफत मुलाखतीच्या उपक्रमात सहभाग घेतला तरी संस्था यशाचा दावा करत असल्याचे खरे म्हणाल्या.

 

या संस्थांकडून योग्य माहिती दिली गेली तर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही, असेही खरे यांनी स्पष्ट केले. CCPA नुसार, भारतातील कोचिंग उद्योगाचा सध्याचा बाजार महसूल सुमारे ५८ हजार ८८ कोटी आहे. अंदाजे २ लाख विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात, तर दिल्ली हे UPSC-CSE कोचिंगचे केंद्र मानले जाते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k