अपात्र उमेदवारांनी बळकवल्या CHB च्या जागा; पेपरही तपासले 

उच्च शिक्षण विभागाकडून केवळ पात्र उमेदवारांची नियुक्ती केली गेली असेल तरच त्यांच्या सीएचबीच्या मानधानाची बिले मंजूर केली जातात.त्यामुळे अनुदानित कॉलेजमध्ये पात्र उमेदवार नियुक्त केले जातात.परंतु, काही अनुदानित कॉलेजमध्ये विना अनुदानित तुकड्या असतात. तर विना अनुदानित कॉलेजमध्ये कोणतीही पात्रता तपासली जात नाही.

अपात्र उमेदवारांनी बळकवल्या CHB च्या जागा; पेपरही तपासले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्राध्यापक भरतीसाठी निकष निश्चित करण्यासाठी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून काथ्याकूट केला जात असताना राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये सीएचबी तत्वावर प्राध्यापक (Professor on CHB basis)म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अपात्र उमेदवारांचे काय करायचे? तसेच या उमेदवारांनी केवळ नेट, सेट,पीएचडीधारक उमेदवारांच्या नोकऱ्याच बळकवल्या नाहीत तर प्राचार्यांच्या संमतीने अपात्र असताना विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासण्याचाही कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभाग अशा उमेदवारांना घरचा रस्ता दाखवणार का? असा सवाल महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेने उपस्थित केला आहे.

संस्थाचालकांच्या नातेवाईकांना प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली जाते,असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र,आता ओळखीच्या अपात्र उमेदवारांना सीएचबी तत्वावरील प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात नियुक्त करण्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थाचालकांना कमी मानधनात काम करणारे उमेदवार मिळत असल्याने संस्थेचालकही वर्षानुवर्ष याच उमेदवारांना नोकरीवर ठेवून घेत असल्याचे दिसून येत आहे. परंतु ,राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून अपात्र उमेदवारांना घरी पाठवून त्यांच्या जागी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.संदीप पाथ्रीकर यांनी केली आहे.

पाथ्रीकर म्हणाले, प्राध्यापक पदासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळे निकष लावले जात आहेत. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये नेट,सेट परीक्षा उत्तीर्ण नसलेले, तसेच पीएच.डी .सुद्धा नसलेले तर काही केवळ पीएचडीसाठी प्रवेश घेऊन ठेवला आहे,असे उमेदवार नियुक्त करण्यात आले आहेत.संस्थाचालकांच्या मर्जीतील असल्यामुळे या उमेदवारांना अत्यंत चांगली वागणूक दिली जाते.तर इतरांना दुय्यम वागणूक मिळते. त्याचप्रमाणे प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम महाविद्यालय पातळीवरतीच पूर्ण केले जाते. प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांच्या निकाल प्रक्रियेत हेच अपात्र उमेदवार कार्यरत असतात. महाविद्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून याच अपात्र उमेदवारांना उत्तर पत्रिका तपासण्याचे काम दिले जाते.त्यामुळे या नियमबाह्य बाबीवर शासनाने लक्ष द्यावे. 

उच्च शिक्षण विभागाकडून केवळ पात्र उमेदवारांची नियुक्ती केली गेली असेल तरच त्यांच्या सीएचबीच्या मानधानाची बिले मंजूर केली जातात.त्यामुळे अनुदानित कॉलेजमध्ये पात्र उमेदवार नियुक्त केले जातात.परंतु, काही अनुदानित कॉलेजमध्ये विना अनुदानित तुकड्या असतात. तर विना अनुदानित कॉलेजमध्ये कोणतीही पात्रता तपासली जात नाही.त्यामुळे शासनाने गुणवत्तेचा विचार करून केवळ पदव्युत्तर पदवी असलेल्या आणि महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अपात्र उमेदवारांना घरचा रास्ता दाखवावा,अशीही मागणी पाथ्रीकर यांनी केली आहे.