अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवता जाहीर; शाळा, महाविद्यालय परीक्षांचे वेळापत्रक बदलले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोक पसरला आहे. बारामतीत लँड करण्यापूर्वी विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते क्रॅश झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. शिक्षण विभागाने शाळांच्या सुट्टीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (Deputy CM Ajit Pawar) संपूर्ण राज्यात शोक पसरला आहे. विमान बारामतीत लँड करण्यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश ( Ajit Pawar plane crash) झाले. राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. शिक्षण विभागाने शाळांच्या सुट्टीबाबत महत्त्वाचे अपडेट्स (School holiday updates) दिले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना आज सुट्टी देण्यात आली. दरम्यान राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि सार्वजनिक सुट्टी विचारात घेता, मुंबई विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
काही जिल्ह्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे विशेष आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे. विशेषतः पुणे आणि बारामती परिसरात शाळा पूर्णपणे बंद राहतील, असं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले असतील. तसेच कोणतेही शासकीय सांस्कृतिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. मुलांच्या सुट्ट्यांबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पालकांनी सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि शाळांच्या सुट्टीबाबत अधिकृत माहितीसाठी संबंधित शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा, अशी माहिती देण्यात आली आहे.