दोन मंत्र्यांच्या संघर्षामुळे, ३० हजार विद्यार्थी अडचणीत
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या विभागाच्या भांडणामुळे ३० हजार विद्यार्थांचे प्रशिक्षण रखडले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विविध समाज घटकांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाला (Pre-Competitive Exam Training) दोन भाजप मंत्र्यांच्या विभागातील संघर्षामुळे खीळ बसली असल्याचे बोलले जात आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gawit) आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या विभागाच्या भांडणामुळे ३० हजार विद्यार्थांचे प्रशिक्षण रखडले (Training of 30 thousand students was stopped)आहे.
बार्टी, सारथी, महाज्योती, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) अशा संस्थांमार्फत प्रशिक्षणासाठी समान धोरणांतर्गत नामवंत संस्था निवडाव्यात आणि कोणत्या संस्थेत प्रशिक्षण घ्यावे याचे स्वातंत्र प्रशिक्षणार्थीना द्यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही पद्धत आम्हाला मान्य नसल्याचे सांगत महाज्योतीने यामधून अंग काढून घेतले आहे.
सर्व संस्थांची स्वायत्तता जपली जायला हवी आपल्या पसंतीच्या प्रशिक्षण संस्थांना विद्यार्थी मिळावेत आणि त्यातून अर्थपूर्ण संबंध जपले जावेत, हा हेतू बाळगून महाज्योती काही प्रशिक्षण संस्था हाताशी धरून स्वतःचा अजेंडा राबवत असल्याचीही चर्चा आहे. मंत्रालयात सतत दबाव टाकत फिरणारे काही संस्थाचालक आपल्याच संस्थांना प्रशिक्षणाचे काम मिळावे आणि संस्थानिवडीचा पर्याय विद्यार्थ्यांना असू नये यासाठी आग्रही आहेत.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले म्हणाले, टीआरटीआयमार्फत जी प्रक्रिया राबविली त्याबाबत तक्रारी आहेत, काही उणिवाही समोर आल्या आहेत. जवळपास ३० हजार विद्यार्थी अजूनही प्रशिक्षण सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण सप्टेंबरच्या सुरुवातीलाच सुरू व्हायला हवे होते, पण वादामुळे मुहूर्त मिळाला नाही. यानिमित्त डॉ. गावित यांच्या खात्यांतर्गत येणारी टीआरटीआय आणि सावेंच्या अखत्यारित येणारी महाज्योती यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.