औषध निरीक्षक भरती रखडली; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ?
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात ७०२ मंजूर पदांपैकी फक्त ३७५ अधिकारी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ही स्थिती समोर आली होती. आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही या समस्येला दुजोरा दिला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेली अनेक दिवस राज्यातील औषध निरीक्षक भरती (Drug Inspector Recruitment) रखडल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फार्मसी फोरमसह अनेक विद्यार्थी संघटनांकडून (many student organizations including Maharashtra Pharmacy Forum) नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात (Food and Drug Administration Department) मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त (Posts Vacant) असल्याने औषध नियंत्रण आणि तपासणी यंत्रणा (Drug control and inspection system) कमकुवत झाली आहे. एकूण २०० मंजूर पदांपैकी केवळ ४८ औषध निरीक्षक कार्यरत आहेत त्यामुळे भेसळयुक्त औषधांवरील कारवाईस मर्यादा येत आहेत आणि औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे त्यामुळे ही भरती तात्काळ करावी अशी मागणी केली जात आहे.
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात ७०२ मंजूर पदांपैकी फक्त ३७५ अधिकारी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ही स्थिती समोर आली होती. आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही या समस्येला दुजोरा दिला आहे.
औषध निरीक्षक, सहायक आयुक्त आणि रसायनशास्त्रज्ञ पदे रिक्त असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) औषध निरीक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती मात्र, महाराष्ट्र फार्मसी फोरमने अनुभवाच्या अटींवर आक्षेप घेतल्याने ही जाहिरात स्थगित करण्यात आली होती.
२०२४ मध्ये सेवाप्रवेश नियम अंतिम करण्यात आले आणि २०२५ मध्ये MPSC कडे १०९ पदांसाठी मागणीपत्र पाठवण्यात आले असूनही अद्याप भरती प्रक्रियेला गती मिळाली नाही, परिणामी ही प्रक्रिया साडेतीन वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे लाखो फार्मसी विद्यार्थी या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
राज्यात औषध निरीक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे त्यामुळे औषध गुणवत्ता नियंत्रण धोक्यात आले असून, अपुऱ्या औषध निरीक्षकांमुळे बाजारातील नकली, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांची तपासणी अपुरी राहत असल्याने जनतेच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे असंही या विद्यार्थी संघटनेमार्फत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निकषानुसार ठरावीक लोकसंख्येच्या प्रमाणात औषध निरीक्षक असणे आवश्यक असले तरी महाराष्ट्रात ही संख्या कमी असल्यामुळे औषध सुरक्षा आणि नियंत्रणासाठी ही भरती तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. औषध निरीक्षक पदासाठी पारदर्शक आणि जलद भरती प्रक्रिया राबवावी, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र फार्मसी फोरमसह अनेक विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
याबरोबरच स्पर्धा परीक्षार्थींच्या भविष्यावर परिणाम होऊ नये आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी MPSC कडून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशीही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.
"नोव्हेंबर 2021 मध्ये औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये अनुभवाची अट असल्याने महाराष्ट्र फार्मसी फोरमच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या परिणामी, राज्य शासनाने सदर जाहिरात तात्पुरती स्थगित केली. सध्या, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी आहे की, एमपीएससीने या पदासाठी नवीन आणि सुधारित जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करावी, जेणेकरून पात्र उमेदवारांना संधी मिळू शकेल. अनेक विद्यार्थ्यांचे वय उलटत असून, त्याचबरोबर आर्थिक बोजवारा वाढल्याने विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण-तणाव येत आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने या प्रक्रियेला अधिक वेळ न लावता तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा." – आदित्य वगरे, डायरेक्टर महाराष्ट्र फार्मसी फोरम.