अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे यांचा राजीनामा; डॉ.सुप्रिया पाटील यांच्याकडे सोपवला कार्यभार
विद्यापीठाचे आधिसभा सदस्य डॉ.हर्ष गायकवाड यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे आणि तत्कालीन अंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई यांच्या विरोधात तक्रार केली होती.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे (Dean of the Faculty of Commerce and Management Dr. Yashodhan Mithare)यांच्याकडील प्रभारी अधिष्ठाता पदाची जबाबदारी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.सुप्रिया पाटील (Head of the Department of Management Science, Dr. Supriya Patil)यांच्याकडे देण्यात आली आहे. मिठारे यांच्याबाबत विद्यापीठाचे आधिसभा सदस्य डॉ. हर्ष गायकवाड (Dr. Harsh Gaikwad)यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi)यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधिष्ठाता पद पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठाचे आधिसभा सदस्य डॉ.हर्ष गायकवाड यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे आणि तत्कालीन अंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई यांच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र, तक्रार देण्यापूर्वीच डॉ.देसाई यांच्याकडील अधिष्ठातापद काढून घेऊन त्यांना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, मिठारे यांनी अधिष्ठाता पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे डॉ.सुप्रिया पाटील यांनी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
डॉ.हर्ष गायकवाड यांनी विद्यापीठाला दिलेल्या पत्रकानुसार पुणे विद्यापीठात सर्व अधिष्ठाता पदे हे प्रभारीच असून सदर प्रभारी पद हे त्यांचे मूळ पदाचा कार्यभार सांभाळून करावयाचे आहे. त्यांनी त्यांचा दिवसभराचा मूळ कार्यभार संपल्यानंतर त्यांना दिलेल्या प्रभारी अधिष्ठातापदास न्याय देणे गरजेचे आहे. मात्र, यशोधन मिठारे व प्रभाकर देसाई हे दोघे विद्यापीठाच्या बहुतांश समित्यांवर असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत या दोघांना विद्यापीठाच्या किती समित्यांवर नामनिर्देशित करण्यात आली, याची माहिती मिळावी. तसेच या दोघांनी ज्या ज्या कॅस पदोन्नती निवड समिती/ सहाय्यक प्राध्यापक निवड समिती व इतर समित्यांवर काम केले आहे.त्याची माहिती दर्शविणारे कागदपत्र मिळावीत, असे पत्र गायकवाड यांनी कुलगुरूंना दिले होते.
विद्यापीठाने व शासनाने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन या दोघांनी केले नाही,अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची संख्या लक्षात घेता जर या दोघांना बहुतांश समित्यांवर नामनिर्देशित केले असेल तर नामनिर्देशित करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर संशय निर्माण होत आहे,असेही गायकवाड यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.