जेईई ॲडव्हान्स 2026' चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
भारतातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन नंतरची ही निर्णायक पायरी असते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षणसंस्थांचे दरवाजे खुले होतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई ॲडव्हान्स २०२६ (JEE Advanced 2026) या प्रतिष्ठित प्रवेश परीक्षेचे (Entrance Exam) आयआयटी रुरकीने (IIT Roorkee) परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर (Schedule announced) केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू होईल. तर जेईई ॲडव्हान्स २०२६ ही परीक्षा १७ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल.
भारतातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन नंतरची ही निर्णायक पायरी असते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षणसंस्थांचे दरवाजे खुले होतात.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना ११ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा एका दिवसात दोन स्वतंत्र सत्रांमध्ये घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी नऊ ते बारा या वेळेत होईल, तर दुसरा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत आयोजित करण्यात येईल. दोन्ही पेपर देणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसासाठी तयारी करूनच परीक्षेला हजेरी लावावी लागणार आहे.
पात्रतेच्या निकषांनुसार, जेईई मुख्य २०२६ पेपर एक मध्ये पहिल्या २ लाख ५० हजारांमध्ये स्थान मिळवणारेच विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र असतात. हा नियम सर्व श्रेणींतील विद्यार्थ्यांवर समानपणे लागू होतो. एखाद्या विद्यार्थ्याला ही परीक्षा जास्तीत जास्त दोन वेळा देता येते आणि त्या संधी सलग दोन वर्षांच्या कालावधीतच वापराव्या लागतात. तसेच उमेदवाराने पहिल्यांदा १२ वी ची परीक्षा २०२५ किंवा २०२६ मध्ये दिलेली असणे आवश्यक आहे.
याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय बारावीमध्ये असणे अनिवार्य आहे. यापूर्वी कोणत्याही आयआयटी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसतात. परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाणार असून देशभरातील निश्चित परीक्षा केंद्रांवर तिचे आयोजन केले जाईल. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार असल्याने विविध भाषिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अधिक सुलभ होणार आहे.