NET परीक्षा रद्द ही तर केंद्राची 'कातडी बचाव' हालचाल; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
परीक्षा रद्द केल्यामुळे अभ्यास केलेल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानच झाले. ९ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परिक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १८ जूनला घेतलेल्या NET-UGC परिक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा तातडीने रद्द (Examination cancelled) केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची 'कातडी बचाव' हालचाल केंद्र सरकारने केली आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया हॅण्डलवरून केला आहे.
परीक्षा रद्द केल्यामुळे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसानच झाले आहे. ९ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परिक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला आहे. त्यात मनस्ताप झाला तो वेगळाच. आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
'परीक्षा पे चर्चा' करणाऱ्यांना घोळ घातल्याशिवाय देशभरात कुठलीही परिक्षा घेता येऊ नये, ह्यापेक्षा मोठा विरोधाभास काय? युवकांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल करणाऱ्या ह्या केंद्र सरकारने दिखाऊपणा बंद करून खरे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणं बंद करावं. आता ह्या परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी 'परीक्षा पे चर्चा' करतील का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
_____________________________________
गेल्या काही दिवसांपासून NEET परीक्षा आणि त्यातील ग्रेस मार्कच्या मुद्द्यावरूनही गोंधळ उडालेला आणि आता UGC-NET परीक्षेत गैरव्यवहार. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ‘पेपर लीक सरकार’ झालंय. एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना आता विद्यार्थी दशेत असलेल्या तरूण-तरूणीचं भविष्य केंद्रीतील सरकारने अंधाकारमय करून टाकलं आहे.
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)