नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक व्हा: डॉ. राजीव अहुजा
“शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे केवळ औपचारिक न राहता, मैत्रीपूर्ण असावे. संवादात दरी निर्माण झाली तर शिक्षणाची खरी ताकद हरवते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
“भारत हा तरुण देश आहे. ३० ते ३५ वयोगटातील लोकसंख्या मोठी असल्याने जगाच्या विकास नकाशावर भारताची छाप उमटणार आहे. मात्र या प्रगतीसोबत भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती झाली पाहिजे. विद्यार्थी केवळ नोकऱ्या शोधणारे न राहता, नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक झाले पाहिजेत. यासाठी शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षक आणि पालक दोघांचीही समान सहभागाची भूमिका महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन आयआयटी रोपडचे संचालक डॉ. राजीव अहुजा यांनी केले.
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बी.टेक., एम.टेक., एमसीए, एमबीए अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा जे.एस.पी.एम. संस्थेतर्फे निगडी येथे पार पडला. या सोहळ्यात १,१८७ पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास टीसीएसच्या पुणे-नाशिक-गोवा विभागप्रमुख प्रसाद शास्त्री, आशिष शहा, जेएसपीएम विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी, संचालक अनिल भोसले, महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस.पी. भोसले, उपसंचालक डॉ. अविनाश बडधे, जेएमसीसी बँक अध्यक्ष रवी सावंत, विद्यार्थी परीक्षा संचालक डॉ. बी.डी. जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. अहुजा म्हणाले, “शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे केवळ औपचारिक न राहता, मैत्रीपूर्ण असावे. संवादात दरी निर्माण झाली तर शिक्षणाची खरी ताकद हरवते. शिक्षक हा मार्गदर्शकच नाही तर मित्रही असावा,
प्रसाद शास्त्री यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हटले, “आपल्या बुद्धीचा वापर नेहमी अभियांत्रिकी दृष्टीकोनातून करा. समस्या सोडवताना नवोन्मेषी विचार हा तुमचा मुख्य मंत्र असावा.”
यावेळी डॉ. रवी जोशी म्हणाले , “आयआयटी रोपडसोबतचे सहकार्य आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाला शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नवीन क्षितिजे गाठण्याची संधी मिळेल. हे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या करेल.”
या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये रोख आणि सुवर्णपदक तर सर्वोत्तम विद्यार्थ्यासही एक लाख रुपये रोख आणि सुवर्णपदक देण्यात आले. भार्गवी भेंडे हिला अकॅडमिक टॉपर तर सुषमा तारे हिला सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशल लोढा आणि प्रा. रश्मी देशपांडे यांनी केले; आभार प्रदर्शन डॉ. बी.डी. जाधव यांनी मानले.