संभाव्य कुलसचिव निवड वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय कुलकर्णी

पात्र उमेदवारांपैकी कोणाची निवड करावी, त्यासाठी विषय वादग्रस्त करण्याचे राजकारण खेळले जाऊ नये.

संभाव्य कुलसचिव निवड वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय कुलकर्णी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)कुलसचिव निवड प्रक्रियेत कुलपती प्रतिनिधी निवड समितीत असतो,असे असताना , कुलसचिव निवड (Selection of Registrar)अहवाल वादग्रस्त परिस्थितीत कुलपती कार्यालयाकडे मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवला असल्याचे समजते, हे आवश्यक आहे का ? तसेच निवड प्रक्रियेनंतर निवड समितीचा अहवाल २४ तासात तयार होऊन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना ती लांबवली गेली. ज्याचे नाव निवड समितीने निश्चित केले आहे, त्याबाबत गोपनीयता न पाळता त्या नावाची निवड निश्चित होऊ नये, या हेतूने संभाव्य नावाविषयी नाव न घेता आरोपांचे वादळ उठवले गेले हे योग्य आहे का ? अशा विविध प्रश्नांचे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni)यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना दिले आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिव नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुमारे वर्षभारापासून प्रलंबित आहे . मात्र, १० , ११ जुलै २०२४ या दिवशी कुलसचिव पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या . त्या नंतर एक आठवडा उलटला तरी कोणाचीही नियुक्ती कुलसचिव पदावर झाली नाही. परंतु, कोणत्या एका उमेदवाराची निवड होणार हे गृहीत धरून संभाव्य कुलसचिवाविषयी विविध दोषारोप करणारी निवेदने विविध संघटनाकडून दिली जात आहेत. त्यामुळे संभाव्य निवड वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे,असे कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पात्र उमेदवारांपैकी कोणाची निवड करावी, त्यासाठी विषय वादग्रस्त करण्याचे राजकारण खेळले जाऊ नये, ज्यामुळे विद्यापीठाच्या निवडप्रक्रिये बाबतची विश्वासाहर्ता संशयास्पद होते. हे टाळले पाहिजे . निवड प्रक्रियेनंतर कुलगुरू परदेशात गेले. ते आल्यानंतर ही निवड प्रक्रिया पूर्ण होणार असे सांगितले जात होते . मधल्या काळात संभाव्य निवडीचे नाव संघटनांना समजते व वाद उभा राहतो, हा योगायोग नक्कीच म्हणता येणार नाही. कुलसचिव पदाचा संभाव्य निवडीबाबत वाद निर्माण झाल्यानंतर विद्यापीठाने कायदेशीर सल्ला कायदे तज्ञानकडून घेतला आहे . या पार्श्वभमीवर निवड प्रक्रिया लांबते हे शंकास्पद आहे.

कुलसचिव नियुक्ती प्रक्रिया पूर्णच होऊ नये, यात संबधित घटकांचे हितसंबंध गुंतले आहेत का ? या बाबत खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे .मूळ मुद्दा , कुलसचिव पदाची दीर्घकाळ लांबलेली निवड प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी . परिणामी विद्यापीठाला नियमित कुलसचिव मिळेल व त्या कामाला योग्य न्याय देता येईल . पर्यायाने विद्यापीठ कायदा तरतुदींचे पालन होईल,असे धनंजय कुलकर्णी यांनी निवेदनात नमूद केले आहे.