PMC वसतिगृहात निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू; ABVP चा आरोप
महानगरपालिका प्रशासनाच्या वसतिगृहातील निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू व कावीळ या आजारामुळे अकाली मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या या हलगर्जीपणा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
काही दिवसांपुर्वी पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) घोले रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील (Dr. Babasaheb Ambedkar Student Hostel) दोन विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू (Untimely death of two students) झाला. महानगरपालिका प्रशासनाच्या वसतिगृहातील निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू व कावीळ या आजारामुळे अकाली मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या या हलगर्जीपणा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील घोले रोड, शिवाजीनगर येथे स्थित महानगर पालिकेच्या, आंबेडकर वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्युची बाब उघडकीस आली. हा मृत्यू डेंग्यू व कावीळ या आजारामुळे झाला. या विद्यार्थ्यांना डेंग्यू व कावीळ या आजाराची लागण ही वसतिगृहातच झाली असल्याचे लक्षात आले. संबंधित वसतीगृहात अत्यंत अस्वच्छता त्याचबरोबर सोयी सुविधांचा अभाव असणे याही गोष्टी आढळून आल्या. वसतीगृहात स्वच्छता नसल्याने पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होऊन त्याचा संसर्ग संपूर्ण वसतिगृहात पसरला. याचबरोबर पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यात असणारी अस्वच्छता हे विद्यार्थ्याला कावीळ होण्यास प्रवृत्त करणारे ठरले.
या संपूर्ण विषयात वसतिगृह प्रशासन हे ढिम्म कारभाराचे उत्तम उदाहरण प्रस्तुत करत आहे. वसतिगृह प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही वसतिगृहात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. या घटनेस सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिका व वसतीगृह प्रशासन आहे, असा आरोप अभाविपने केला आहे.
अभाविपने केलेल्या आंदोलनात पुढील दोन दिवसात वसतिगृह आणि वसतिगृह परिसर यांची स्वच्छता व्हावी त्याचबरोबर संबंधित दोषींवर कारवाई करून निलंबन करावे. व मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यावर पुणे महापालिकेचे उपायुक्त श्री. नितीन उदास यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले व त्यांनी पुढील तीन दिवसात सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले असल्यीची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आली आहे.