वाडिया कॉलेज बलात्काराच्या घटनेला वेगळे वळण 

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असला तरी त्याला वेगळे वळण दिले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांकडून केला जात होता.

वाडिया कॉलेज बलात्काराच्या घटनेला वेगळे वळण 
पीडित मुलीचे वकील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर (Wadia College student )झालेल्या बलात्काराच्या घटनेला (rape incidence)वेगळे वळण मिळाले आहे. पीडित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या वकिलांनी केला आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पीडित मुलगी व पालकांचा जबाब ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे पालकांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. परंतु, ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी जबाब ऐकून घेण्यात तयारी दर्शविल्यानंतर पालकांनी पत्रकार परिषद रद्द केली, असे वकिलांकडून सांगण्यात आले. महाविद्यालय प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका न घेतल्यामुळे संबंधित पीडित विद्यार्थिनीवर आणखी एकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोपही वकिलांकडून बुधवारी केला.

वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून विविध विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांकडून महाविद्यालयासमोर आंदोलने केली जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असला तरी त्याला वेगळे वळण दिले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांकडून केला जात होता. त्यामुळे बुधवारी वस्तुस्थिती सांगण्यासाठी पालकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, ही माहिती पोलीस प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी पालकांची संपर्क साधून आपले सर्व म्हणणे ऐकून घेणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर पालकांनी पत्रकार परिषद रद्द केली, असे पीडित मुलीचे वकील निवृत्ती चापके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवृत्ती चापके म्हणाले, वाडिया प्रकरणामध्ये 6 सप्टेंबर रोजी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली होती. त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, हे प्रकरण समोर आणले गेले नाही. पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रार करूनही पालकांची तक्रार ऐकून घेतली जात नव्हती. रात्र रात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले जात होते, असाही आरोप निवृत्ती चापके यांनी केला. 

या प्रकरणांमध्ये काही मोठ्या अधिकाऱ्यांची मुले असण्याचा संशय वकिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाला पुढील काळात वेगळे वेळ लागण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी पोलीस पालकांचे म्हणणे ऐकून घेत नव्हते का आणि पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केल्यानंतर पोलीस या प्रकरणात जबाब नोंदवून घेण्यास का तयार झाले ? असाही सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.