कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच नाही : डॉ. तारा भवाळकर
विद्यापीठांमध्ये काय साजरा करावे आणि काय नाही याचे कुलगुरूंना आदेश येतात. त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात,असे कुलगुरू सांगतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'' जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठांमध्ये काय करायचं ते ठरवत असतो. पण दिवसेंदिवस सध्याच्या कुलगुरूंवर बंधनं येत आहेत. शासकीय आदेशानुसार त्यांना चालावं लागतं. त्यामुळे कुलगुरू(Vice Chancellor) पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही. त्यामुळे कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी हवी,असे मत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar)यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. तारा भवाळकर बोलत होत्या.यावेळी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
तारा भवाळकर म्हणाल्या, विद्यापीठातील अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत. विद्यापीठांमध्ये काय साजरा करावे आणि काय नाही याचे कुलगुरूंना आदेश येतात. त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात,असे कुलगुरू सांगतात.त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळायला हवी.तसेच विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण मिळाले पाहिजे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुय्यम मराठी शिकवली जाते.हे चूकीचे आहे. त्याच प्रमाणे महाविद्यालयांमध्ये मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांची स्थिती वाईट आहे, याकडेही भवाळकर यांनी लक्ष वेधले.
एक उदाहरण सांगताना तारा भवाळकर म्हणाल्या, मी नोकरी करत होते त्या संस्थेचे जे संचालक मंडळ होते, ते सगळं गुजराती संचालक मंडळ होते. एक दिवस संचालक मंडळातील गुजराती गृहस्त आले आणि प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसले. दुसरे एक जेष्ठगृहस्त होते. त्यात ते आले आणि ते म्हणले त्या खुर्चीवर बसू नका ती प्राचार्यांची खुर्ची आहे. या आवारामध्ये प्राचार्य हा राजा आहे. तुम्ही मी - नाही, आपण संचालक मंडळामध्ये जरी असलो तरी त्या खुर्चीचा अधिकार आपल्याकडे नाही, हा आदर्श लोप पावत चालेला आहे.त्यामुळे शैक्षणिक संस्थांना स्वायत्ता मिळायला हवी.