TET विरोधात आंदोलन करणारे 70 टक्के शिक्षक लाडावले; आमदार प्रशांत बंब यांचे वादग्रस्त वक्तव्य

शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यास काय अडचण आहे, असा सवाल बंब यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे परीक्षा देऊन हिम्मत दाखवा, बनावट पदव्या घेऊन बनावट शालार्थ आयडी घेऊन शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये शिक्षकांकडून कमावले जातात,असा आरोपही बंब यांनी केला.

TET विरोधात आंदोलन करणारे 70 टक्के शिक्षक लाडावले; आमदार प्रशांत बंब यांचे वादग्रस्त वक्तव्य

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

टीईटी सक्तीविरोधात (TET binding) राज्यभर शिक्षकांनी आंदोलन केले.मात्र,आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची केवळ वेतन कपात करू नये, तर त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.राज्यातील 70 टक्के शिक्षक हे लाडावलेले आहेत.त्यांनी टीईटी परीक्षा (tet exam)दिलीच पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb)यांनी केले असून याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांना पत्र लिहिणार असल्याचेही बंब यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या बंब यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे.सुमारे 20 ते 25 वर्षे सेवा करूनही शिक्षकांना टीईटी बंधनकारक केल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.त्यामुळे राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यात सर्व शिक्षक व शिक्षाकेतर संघटनांनी टीईटी सक्ती विरोधात आंदोलन केले.हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले.तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे,अशी भूमिका मांडली.त्यात शिक्षक विभागाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले जाईल,असे स्पष्ट केले. त्यावर केवळ वेतन कपात करू नका तर या शिक्षकांचे निलंबन करा,अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली. 

बंब म्हणाले, शिक्षकांचा टीईटी परीक्षेला विरोध म्हणजे बालकांच्या भवितव्यांशी आम्ही खळू; आम्हाला त्याची परवानगी द्या,असे म्हणण्यासारखे आहे. शिक्षक जे शिकवतात त्यावरच टीईटी परीक्षा घेतली जात आहे, त्यामुळे शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यास काय अडचण आहे, असा सवाल बंब यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे परीक्षा देऊन हिम्मत दाखवा, बनावट पदव्या घेऊन बनावट शालार्थ आयडी घेऊन शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये शिक्षकांकडून कमावले जातात,असा आरोपही बंब यांनी केला.त्याचप्रमाणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे,असे पत्र शिक्षण मंत्री यांना लिहिणार असल्याचे बंब यांनी म्हटले आहे.