RTE ची सुनावणी पुर्ण ; प्रवेशाची प्रतीक्षा कायम, न्यायालयाने निकाल ठेवला राखून
11 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी पुर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल राखून ठेवला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीईअंतर्गत (RTE) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलामुळे प्रकरण न्यायालयात गेले. त्या याचिकांवर (court petition) ११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम (Final hearing) सुनावणी पार पडली. न्यायालयीन सुनावणी पुर्ण झाली असली तरी न्यायालयाने गुरूवारी निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना प्रवेशासाठी (Awaiting RTE admission) आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाल्यांचा प्रवेश आणि आणि न्यायालयाचा निकाल यात लाखो पालक संभ्रमावस्थेत आहेत.
यंदा शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले . त्यामुळे शाळा सुरू होऊन एक महिना होत आला आहे. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली आहे. खासगी शाळांमधील आरटीई प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आले.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशास उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे. त्यात आता खासगी शाळांनी विविध हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. त्यामुळे सुनावणीस वेळा लागला. परिणामी शाळा प्रवेश सोडत जाहीर करण्यास अडचणी निर्माण झाल्या. आरटीईतून कोणाला कुटहे प्रवेश मिळाला याबाबत जुलै अर्धा संपला तरीही प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही.
विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरात एक किमी अंतरावर शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असले तर या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही,असा निर्णय राज्य शासनाने घेतला.त्यास आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पध्दतीने इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.मात्र, ही प्रक्रिया न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच सुरू होणार आहे. त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिक्षण विभागाकडे आरटीई प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 217 शाळांमधील 1 लाख 5 हजार 399 जागांवरील प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 972 अर्ज आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली असली तरी कोणाला प्रवेश मिळाला याची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
-----------------------
आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकावर गुरूवारी सुनावणी झाली.सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. सुनावणी पूर्ण झाली असली तरी गुरूवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला नाही.
- शरद जावडेकर, याचिकाकर्ते