कृषी अधिकाऱ्यांचा नियुक्तीचा आदेश रद्द
1 मार्च 2024 रोजी 135 उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission)माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे कृषी अधिकारी (Agricultural Officer) या पदावर शिफारस करण्यात आलेल्या 135 उमेदवारांचा नियुत्ती आदेश राज्य शासनाने रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)कृषी अधिकारी पदा संदर्भात याचिका दाखल असून न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन ही नियुक्ती रद्द (Cancellation of appointment)करण्यात आली असल्याचे शासनातर्फ स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी, पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागात कृषी सेवा गट ब (कनिष्ठ) या संवर्गातील कृषी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांसंदर्भात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर 1 मार्च 2024 रोजी 135 उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु, प्रशासकीय कारणास्तव हा आदेश रद्द करण्यात येत आहे, असे परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे सुमारे दीड महिन्यांपूर्वी तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच गुणवत्ता यादी जाहीर करून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। मात्र, या उमेदवारांना नियुक्ती दिली गेली नव्हती. कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जात असेल तर तलाठी भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती का दिली जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता.परंतु, आता कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश सुद्धा रद्द करावा लागला आहे. परिणामी तलाठी पदास पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्तीला विलंब होणार असल्याचे या निर्णयामुळे अधोरेखित होत आहे.