पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत; शिक्षण मात्र्यांनी बोलवली प्राचार्य, कुलगुरूंची बैठक
राज्यात पावसाने थैमान घातले असून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांची पुस्तके वह्या आदी वस्तू पावसाने भिजून खराब झाली आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व सामान्य नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तूवाहून गेल्या आहेत. त्यामुळे यासर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पूरग्रस्त भागातील प्राचार्य, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक आणि अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव यांची ऑनलाईन बैठक घेतली जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता ही बैठक पार पाडणार आहे.
राज्यात पावसाने थैमान घातले असून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांची पुस्तके वह्या आदी वस्तू पावसाने भिजून खराब झाली आहेत. तर काही विद्यार्थ्यांना असण्यासाठी घरही राहिले नाही.या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे. त्यांच्या शिक्षणाचा भार शासनाने उचलावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, प्राचार्य व इतर घटकांशी संवाद साधून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी शासनातर्फे किंवा सीएसआरच्या माध्यमातून काय मदत करता येईल, याचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातील मराठवाड्यातील जिल्ह्यासह, सातारा, सांगली, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक घेतली जाणार आहे, असे राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.