शाळेतील प्रत्येकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करा; बदलापूर घटनेनंतर सरकारचे आदेश

बदलापूर येथे शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मोठ आंदोलन उभ राहिले. जर मुली शाळेतही सुरक्षित नसतील तर मग आम्ही कुठ जायचे आता संतप्त सवाल पालकांकडून सरकारला विचारला जात आहे.

शाळेतील प्रत्येकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करा; बदलापूर घटनेनंतर सरकारचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दोन दिवसांपुर्वी बदलापूर येथे शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual abuse of school girls) झाल्याची घटना समोर आली आणि राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर मोठ आंदोलन उभ राहिलं आहे. जर मुली शाळेतही सुरक्षित नसतील तर मग आम्ही कुठे जायचे? असा संतप्त सवाल पालकांकडून सरकारला विचारला जात आहे. या घटनेनंतर सरकारने आता मोठी घोषणा केली आहे. शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification of Employees) करण्याचे आदेश कौशल्य रोजगार व उद्योजगता मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काढले आहेत. त्याबाबत त्यांनी आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर माहिती शेअर केली आहे. 

महिला व बालकांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न आणि उपाययोजना करण्याच्यादृष्टीने मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र लिहिले आहे. या संदर्भात मुंबई उपनगर परिसरातील सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना याबाबत सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला आणि मुलींना स्व संरक्षणाचे धडे द्यावेत, त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महिला व बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारसह समाज म्हणून आपल्या सर्वांचीच आहे, त्यामुळे असे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी आपण सर्वांनी जागृत रहावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी करत आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले .

मुंबईतील प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला स्वच्छता गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.  प्रत्येक शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश. कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, कॅन्टीनमधील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश. शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा आढावा घेतला जाणार असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.