आकृत्या पेन किंवा पेन्सिलने काढल्या तरी मिळणार गुण ; बोर्डाच्या अध्यक्षांनीच केले स्पष्ट
भाषा विषयाच्या प्रश्नांसाठी पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी आकृत्या काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृतीपत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन की पेन्सिलने (Figures Even if you draw with pen or pencil )काढाव्यात याबाबत गेल्या काही दिवसांपासून शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु, त्यावर आता राज्य मंडळानेच पडदा टाकला आहे. बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शनिवारी यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला. भाषा विषयाच्या प्रश्नांसाठी पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी आकृत्या काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत , असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (State Board President Sharad Gosavi)यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा सध्या घेतल्या जात आहेत. तर दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. भाषा विषयासाठी बोर्डाकडून कृतीपत्रिकेवरील प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांसाठी काही वेळा आकृत्या काढाव्या लागतात. या आकृत्या पेनने काढाव्यात की पेन्सिलने यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मंडळात यावर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व मुख्य नियमकांना या संदर्भात सूचना देण्याचे निश्चित करण्यात आले.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, भाषा विषयाच्या कृतीपत्रिकेसंदर्भातील प्रश्नांच्या आकृत्या पेन किंवा पेन्सिलने काढला तरी चालणार आहेत. पेन व पेन्सिलने काढलेल्या आकृत्यांना गुण देण्याबाबत सर्व मुख्य नियमांना सूचना दिल्या जाणार आहेत. पेन व पेन्सिलने आकृत्या काढण्याचा निर्णय हा केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनेच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. आकृत्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे बोर्डाच्या परीक्षा मंडळात याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.