पुरवणी वेळापत्रकानुसार 'आयटीआय' प्रवेशासाठी मुदतवाढ
यापूर्वी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ दिली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ (Extension of time for online application) देण्यात आली आहे. यापूर्वी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ दिली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने (Department of Vocational Education and Training) स्पष्ट केले आहे.
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेंतर्गत ऑगस्ट २०२४ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. समुपदेशन फेरीत पात्र आणि नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २३) रात्री दहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑगस्ट २०२४ च्या प्रवेश सत्रात कोणत्याही व्यवसायात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश देण्यात येणार नाही, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. समुपदेशन फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत त्याचदिवशी प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचदिवशी प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुल्या करण्यात येतील. तसेच, समुपदेशन फेरीसाठी दिलेल्या कालावधीत खासगी आयटीआयमधील संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर रिक्त असलेल्या जागा देखील प्रवेशासाठी उपलब्ध राहणार आहेत.
पुरवणी वेळापत्रकानुसार उमेदवारांना २३ ऑक्टोबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज आणि त्याची निश्चिती करता येणार आहे. २३ ऑक्टोबर (रात्री १० वाजेपर्यंत) समुपदेशन फेरीसाठी पात्र आणि नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे. २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित आयटीआयमध्ये व्यक्तिशः हजर राहून समुपदेशन फेरीत हजेरी नोंदवावी. हजर झालेल्या विद्यार्थ्यांची संस्थास्तरावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल, त्यानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी बोलावले जाईल आणि उपलब्ध प्रवेशाच्या जागांचे वाटप केले जाईल.