शिक्षण म्हणजे समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र - कुलपती रमेश बैस
पदवी किंवा सुवर्ण पदक प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल,असेही रमेश बैस यांनी सांगितले.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
" गुणवत्तापर्ण उच्च शिक्षण म्हणजे केवळ रोजगार निर्माण करण्यापूरते नाही तर समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र असावे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारे भारताला महाशक्ती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. तसेच रोबोटीक्स,नॅनो कॉम्प्युटरसारख्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासोबत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा लागेल." ,असे मत राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 122 व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी राज्यपाल रमेश बैस बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. महेश काकडे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
बैस म्हणाले, पदवी किंवा सुवर्ण पदक प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. पुणे शहर माहिती व तंत्रज्ञान व ऑटोमोबाईल क्षेत्राचे केंद्र आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने होण्यासाठी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून त्यात आर्टिफिशल इन्टेलीजन्स , रोबोटिक्स ,नॅनो कम्प्युटर या सारख्या आधुनिक बाबींचा अंतर्भाव करावा लागेल.तसेच शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्य, नैतिकता, घटनात्मक मूल्ये, बौद्धीक जिज्ञासा, वैज्ञानिकता, रचनात्मकता आणि सेवाभावनेच्या आधारे विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, तंत्रज्ञान यासह अन्य क्षेत्रातही संधी शोधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल.
चंद्रकांत पाटील म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणात ज्ञान, कौशल्य विकास, परंपरेचा अभिमान या बाबींवर भर देण्यात आला आहे.या तीन पैलूंच्या आधारे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे विद्यार्थ्यांनी प्रगती करावी. एनईपीनुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडीट) आपल्या क्रेडीट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत,अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता त्यांनी विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात प्राविण्य दाखवावे.
डॉ.राजेश गोखले म्हणाले, जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे विकासाचे नवे सूत्र आहे. या क्षेत्रात आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्नातकांनी पूर्ण करावे. बुद्धीमत्त्ता, कठोर परिश्रम, बदलाला सामोरे जाण्याची क्षमता जीवनात यशस्वी करेल.परिश्रमाशिवाय यश नाही, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करावी.