शिक्षणमंत्री शाळेच्या पंगतीत; विद्यार्थ्यांसोबत आमरसाच्या जेवणाचा घेतला आस्वाद
एवढचं नाही तर, त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसासह मिष्टान्न भोजन वाढून त्यांच्यासमवेतच बसून जेवणाचा आस्वाद घेतला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शालेय जीवनाच्या पहिल्याच दिवशी (school first day) विद्यार्थ्यांच्या मनात आनंद साठवणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असा शाळा प्रवेशोत्सव २०२५ आज राज्यभरात साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse) यांनी बागलाण तालुक्यातील तुंगन दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला (Zilla Parishad Primary School at Tungan Digar in Baglan taluka) भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. एवढचं नाही तर, त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसासह मिष्टान्न भोजन वाढून त्यांच्यासमवेतच बसून जेवणाचा आस्वाद घेतला.
जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगीच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी वस्तीचे तुंगन दिगर हे गाव, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेसाठी ओळखले जाते. आजच्या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषेतील बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. स्वागतासाठी फुलांची सजावट व वाद्यांचा गजर होता. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या आईच्या साक्षीने शाळा परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, पाठ्यपुस्तकं, गणवेश, आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शासन शिक्षणावर भरघोस खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेतली जात आहे असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या आठवणीत रेखाटले जाणारे सुंदर क्षण ठरले असून त्यांच्या शालेय जीवनात उभारी देणारे ठरतील असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळांना भेटी देत मुलांचा पहिला दिवस खास करण्यासाठी सहभाग घेतला होता.