भारती विद्यापीठाला 'नॅक'कडून पुनर्मूल्यांकनात A++ दर्जा

भारती विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकनात A++ (सीजीपीए ३.६०) दर्जा मिळाला आहे.

भारती विद्यापीठाला 'नॅक'कडून पुनर्मूल्यांकनात A++ दर्जा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारती विद्यापीठ (Bharti University)अभिमत विश्वविद्यालयाला नॅक - NAAC (National Assessment and Accreditation Council) पुनर्मूल्यांकनात A++ (सीजीपीए ३.६०) दर्जा मिळाला आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या गुणवत्तेवर उमटलेली ही अभिमानास्पद मोहर आहे, अशी भावना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी (Vice Chancellor Dr. Vivek Savji)यांनी व्यक्त केली.  

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विवेक सावजी बोलत होते. यावेळी डॉ.के.डी.जाधव, डॉ.एम.एस.सगरे, जी.जयकुमार, डॉ.प्रसाद पोरे, डॉ. कीर्ती गुप्ता, डॉ. वर्षा पोखरकर. डॉ.अन्थनी रोज, ऐश्वर्या हार्डीकर आदी उपस्थित होते.

डॉ. सावजी म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक समितीने २४, २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाला भेट दिली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पायाभूत सुविधा, गुणवत्ता, संशोधन व व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे नोकरी व व्यवसायाचे प्रमाण, समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोचविण्याचे प्रयत्न अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करुन त्यांनी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयास सात वर्षांसाठी A++ दर्जा प्रदान केला आहे.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे नॅककडून हे झालेले चौथे मूल्यांकन आहे. या पूर्वीच्या तीनही मूल्यांकनात विश्वविद्यालयाला ७ वर्षांसाठी अनुक्रमे A आणि A+ दर्जा मिळालेला होता. या दृष्टीने भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे देशातील निवडक विद्यापीठांपैकी एक आहे. ही विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या इर्षा व पर्यावरण संस्थेत होणारे मुलभूत गुणवत्तापूर्ण संशोधन, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार आणि विद्यापीठ व उद्योगक्षेत्र यांच्या परस्पर संबंधातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या अनेक संधी याचा नॅक समितीने विशेष गौरवाने उल्लेख केला.

डॉ. सावजी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते. हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः अनुभवले होते. शैक्षणिक साधनांचा आणि सुविधांचा अभाव हेच ग्रामीण भागाच्या मागासलेपणाचे कारण असून शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन गेल्याशिवाय या समाजाला उन्नतीचा प्रकाश दिसणार नाही.

 गेल्या ६० वर्षांत भारती विद्यापीठाने देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. देशभर शैक्षणिक संकुले असणारे, सर्व विद्याशाखांचे शिक्षण देणारे, ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा मिलाफ असणारे, महानगरांबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण केंद्रे उभी करून तेथील घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे, स्त्रियांच्या  शिक्षणासाठी पुढाकार घेणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाचा नावलौकिक जगभर आहे.

भारती विद्यापीठाला भारत सरकारने १९९६ साली अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा दिला. गेल्या २८ वर्षांत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने गुणवत्तेच्या बळावर देदीप्यमान कामगिरी करून नामांकित विश्वविद्यालय म्हणून लौकिक मिळवला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने A-ग्रेड युनिव्हर्सिटी म्हणून उमटवलेली मोहर, नॅकने पुनर्मूल्यांकनात दिलेला A++ दर्जा, एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांनी मिळविलेले मानांकन या गोष्टी विश्वविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवणाऱ्या आहेत.

भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच भारती विद्यापीठाच्या कार्याची खरी पावती आहे. नॅक मूल्यांकनाच्या या प्रक्रियेत कुलपती डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.