बजेटने केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा; बजेटची करणार होळी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात २०१८ पासून गेली ६ वर्षे वाढ झालेली नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी लोकसभेत २०२४-२५ चे बजेट सादर केले. सक्षम अंगणवाडी व पोषण २ या हेडवर मागील वर्षीच्या वाढीव बजेटच्या २१ हजार ५२३ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बजेट वाढवण्याऐवजी ३२३ कोटींची कपात करून फक्त २१ हजार २०० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.त्यामुळे आता सध्या राज्यात पुकारलेल्या असहकार आंदोलनाबरोबर संपूर्ण राज्यातील प्रत्येक प्रकल्पात बजेटची होळी (Budget Holi) करण्याचे आंदोलन करण्यात येईल,असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम (Anganwadi Employees Association President Shubha Shamim)यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात २०१८ पासून गेली ६ वर्षे वाढ झालेली नाही. २०१३ मध्ये आहाराच्या दरात प्रति लाभार्थी दररोज ६ रुपयांवरून ७ रूपये ९२ पैसे, अशी वाढ करण्यात आली. तसेच २०१७ साली फक्त ८ पैशांची वाढ करून तो दर ८ रुपये करण्यात आला. त्यानंतर आजतागायत गेल्या ७ वर्षात या दरात वाढ झालेली नाही.त्यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे.या बजेटमध्ये मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केले आहे.
केरळमधील त्रिवेंद्रम येथे आखील भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या बैठकीत केंद्र सरकारने केलेल्या या बजेट कपातीची व कर्मचारी व कुपोषित बालकांकडे केलेल्या दुर्लक्षाची तीव्र टीका करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.फेडरेशनने देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या लाभार्थी पालकांना सोबत घेऊन या निराशाजनक,जनविरोधी बजेटची होळी करावी, असे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या राज्यात पुकारलेल्या असहकार आंदोलनाबरोबर संपूर्ण राज्यातील प्रत्येक प्रकल्पात बजेटची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येईल,असे शुभा शमीम यांनी कळवले आहे.