11th admission: प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची मुभा

यंदा प्रवेशाच्या पाच फेऱ्या होणार असून, यात नियमित ४ व एक विशेष फेरी होणार आहे. या प्रत्येक फेरीत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नवी नोंदणी करता येईल.

11th admission: प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची मुभा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०२५-२६ पासून राज्यात सर्वत्र इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया (11th admission process) ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. याअंतर्गत मुदतवाढीसह ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी (student registration) करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. आता शिक्षण विभागाने (Department of education) नोंदणीसाठी दिलेली मुदत संपली आहे, मात्र अजूनही अनेक विद्यार्थी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीपर्यंत म्हणजे ४ नियमित फेरी व १ विशेष फेरी यामध्ये प्रत्येक फेरीच्या टप्प्यावर नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी (student new registration) करण्याची मुभा दिली आहे.
 
राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने एकाच वेबसाईटवरून प्रवेश करण्यात येत आहे. या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २१ लाखांहून अधिक जास्त आहे. यासोबतच २५०० उच्च माध्यमिकचे वर्ग असणाऱ्या शाळा, राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांशी संबंधित, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग, विमुक्त जाती व जमाती या विभागाच्या आणि सैनिकी शाळा तसेच केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे मान्यताप्राप्त शाखांमध्ये जवळपास ३ लाख प्रवेश क्षमता आहे. दरवर्षी राज्यात साधारणतः १३ लाख विद्यार्थी राज्य मंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात तर अन्य विद्यार्थी हे व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण, नर्सिंग अशा कोर्सेसला प्रवेश घेतात.  

राज्यात यंदा दहावीचे राज्य मंडळ संलग्न शाळांमधून १३ लाख ८७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच अन्य मंडळांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधले साधारण १ लाख ४० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्हींचा एकत्रित विचार करता एकूण १५ लाख २० हजार विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. आतापर्यंत १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

दरम्यान, यंदा प्रवेशाच्या पाच फेऱ्या होणार असून, यात नियमित ४ व एक विशेष फेरी होणार आहे. या प्रत्येक फेरीत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नवी नोंदणी करता येईल.