11th Admission : पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर; राज्यात २० लाख जागा उपलब्ध

राज्यभरातील ९ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांना बुधवार २१ मे पासून अंतिम (फायनल) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी ३ जूनला जाहीर झाल्यावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.

11th Admission : पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर; राज्यात २० लाख जागा उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

यंदा पहिल्यांदाच राज्यभरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया (11th Admission Process 2025-26) केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. त्यासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर (First round schedule announced) करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी आजपासून दोन दिवस ऑनलाईन पद्धतीने सरावासाठी तात्पुरती प्रक्रिया सुरू (Temporary process for practice begins) झाली आहे. राज्यभरातील ९ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी (9 thousand 294 junior college registrations) केली असून, विद्यार्थ्यांना बुधवार २१ मे पासून अंतिम (फायनल) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी ३ जूनला जाहीर झाल्यावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी २१ मेपासून सुरू होणार आहे. त्यानुसार २१ ते २८ मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्तायादी ३० मे रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीवर १ जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन ६ ते १२ जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. 

प्रोफाईल सरावासाठी दोन दिवस

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार १९ आणि २० मे रोजी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदवण्याचा सराव करू शकणार आहेत. सरावासाठी भरलेली माहिती २० मे रोजी मध्यरात्री संकेतस्थळावरून हटवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना २१ मे रोजी नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. २१ मे रोजी भरलेलीच माहिती अंतिम आणि ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यभरात २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६, वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत. सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ६४० जागा मुंबई विभागात, त्या खालोखाल ३ लाख ७५ हजार ४८६ जागा पुणे विभागात, २ लाख ६६ हजार ७५० जागा छत्रपती संभाजीनगर विभागात असल्याची माहिती देण्यात आली.