आरटीई प्रवेशाचा सोमवारी शेवटचा दिवस
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) (Right To Education -RTE act ) ऑनलाइन पद्धतीने २५ टक्के आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. प्रवेशासाठी लॉटरीद्वारे राज्यातील ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची (student ) निवड झाली असून त्यातील ६२ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. सोमवारी आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस (last day of Rte admission) असून यावर्षी सुध्दा प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहणार असल्याचे दिसत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस आहे. राज्यातील ८२३ शाळांमधील एक लाख १ हजार ८४६ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना लॉटरीद्वारे प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्यातील सुमारे ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला तरी २० हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत.
पुणे जिल्ह्यातील ९३७ शाळांमधील १५ हजार ५९६ जागांसाठी ७७ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १५ हजार ५०१ जागांवर विद्यार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड करण्यात आली आहे.त्यामधील १० हजार ५२८ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशासाठी देण्यात आलेल्या कालावधीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यात ६ हजार ५१३ जागांपैकी चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात ४ हजार ७५० जागांपैकी ३ हजार ८० विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. ठाण्यात दहा हजार ९९६ पैकी ६ हजार ९७२ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.