एकही शिक्षक नसलेल्या शाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात ?

संचमान्यतेच्या जाचक अटीमुळे पुणे जिल्ह्यात ७२ शाळेतील इ ९ वी १० वीचे वर्ग विनाशिक्षक झाले असून या शाळांची बैठक पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.त्यात याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

एकही शिक्षक नसलेल्या शाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने संचमान्यतेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अनेक शाळांना एकही शिक्षक मिळालेला नाही.त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी येत्या 17 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत.तसेच रस्त्यावरची लढाई लढल्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर न्यायालयात दाद मागितली जाणार आहे, असे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिध्द करून त्याची अंमलबजावणी केली. या महिन्यात महाराष्ट्रात संचमान्यतेनुसार वितरीत करण्यात आलेल्या पदांमुळे अनेक शाळा बंद पडणार आहेत. संचमान्यतेच्या जाचक अटीमुळे पुणे जिल्ह्यात ७२ शाळेतील इ ९ वी १० वीचे वर्ग विनाशिक्षक झाले असून या शाळांची बैठक पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.त्यात याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सुरेश कांचन ,राजेश गायकवाड, सुनील गायकवाड,संदिप जगताप, विठ्ठल माळशिखारे,चंद्रकांत कोकाटे सुनिल गायकवाड (हवेली) आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने संच मान्यतेची जाचक अट रद्द करवी, यासाठी मुख्याध्यापक संघाने वेगवेगळ्या पातळीवर आंदोलने केली आहेत. मात्र, आता न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढणे आवश्यक असून मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. तसेच येत्या  १७ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, असेही नंदकुमार सागर यांनी सांगितले.