महात्मा फुलेंचा वारसा पुढे घेऊन जाणारा आदर्श शिक्षक

एक-दोन नव्हे तर चौदा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यातील काही मुली डीएड करून शिक्षिका झाल्या तर काही मुली इंजिनिअरिंग करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

महात्मा फुलेंचा वारसा पुढे घेऊन जाणारा आदर्श शिक्षक
Teacher Sanjiv Bagul

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुलींना शिक्षणाचे (Women Education) दरवाजे खुले करून देणारे थोर समाजसुधारक महात्मा फुलेंची (Mahatma Phule) दोन दिवसांनी १९६ वी जयंती आपण साजरी करणार आहोत. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून त्यासाठी अनेक हात झटत आहेत. गोरगरीब मुलांनी शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत. दुर्गम भागात प्राथमिक शिक्षक असलेले संजीव माधव बागुल (Sanjiv Bagul) हे त्यापैकीच एक नाव. एक-दोन नव्हे तर चौदा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यातील काही मुली डीएड करून शिक्षिका झाल्या तर काही मुली इंजिनिअरिंग करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तर काही मुली पदवी पदविकेचे शिक्षण घेत आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात जाऊन स्रीशिक्षणासाठी महाराष्ट्राच्या भूमीत अनेक समाजसुधारकांनी महान कार्य केले. महात्मा फुले व महर्षी कर्वे यांनी तर आपले संपूर्ण आयुष्य स्रीयांच्या शिक्षणासाठी सार्थकी लावले. असे असले तरी आजही खेड्यापाड्यात, दुर्गम भागात गोरगरीबांच्या मुलींना शिक्षण घेत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दारिद्र्य, पालकांचे अज्ञान, समाजातील वाईट प्रवृत्ती, अपुऱ्या सुविधा अशा कारणांमुळे आजही अनेक मुली महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत.

याचाच विचार करून दुर्गम भागात एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना या मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? या विचारानेच मुळशी तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात काम करणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक संजीव माधव बागुल प्रेरित झाले. दहा वर्षांपूर्वी त्यांनी रूपाली व पूजा या मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेऊन आपल्या कामाची सुरूवात केला. दुर्गम भागातील गोरगरीब मुलींना व पालकांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मुलींचा शिक्षणाचा खर्च व शैक्षणिक पालकत्व निभावण्याचा विश्वास निर्माण केला. याचा परिणाम म्हणजे आजतगायत जवळपास चौदा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

हेही वाचा : साताऱ्याचं वेगळंच पाणी, पहिलीतलं पोरगंही बोलतंय जपानी!

या कामात बागुल यांना इन्स्टिटय़ूट फॉर वुमेन आंत्रप्रेनॉरियल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या रानडे, एज्यू सर्व्ह ट्रस्टचे फुलपगार व आशा प्रतिष्ठानचे डांगी व अनेक व्यक्तींची मदत मिळत आहे. या मदतीतून या सर्व मुलींचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, शालेय स्टेशनरी इ. गरजांची पुर्तता केली जात आहे. यामुळेच यातील काही मुली डीएड करून शिक्षिका झाल्या तर काही मुली इंजिनिअरिंग करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत व काही मुली पदवी पदविकेचे शिक्षण घेत आहेत.

यासाठी बागुल यांना खूप मेहनत घ्यावी लागली. याविषयी ते सांगतात की, पालकांचा विश्वास संपादन करणे, मुलींना सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, समाजातून आर्थिक मदत मिळवणे, शैक्षणिक संस्थांशी व शिक्षकांशी सतत संपर्कात रहाणे, वसतीगृह प्रमुखांशी संपर्क करणे,  मुलींना वेळोवेळी भेटून त्यांच्या अडीअडचणी सोडवणे व त्यांना प्रेरणा देत रहाणे इत्यादी पालकत्वाची महत्वाची भूमिका अगदी आवडीने व सामाजिक कर्तव्य म्हणून पार पाडत आहे.

एक शिक्षक म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच मुलांच्या शिक्षणाबद्दल तळमळ करणे हे एका बालरक्षकाचे कर्तव्यच आहे, असे मनोमन वाटते. आज महात्मा फुले यांची १९६ वी जयंती साजरी करताना फुलेंचा हा वारसा यापुढेही चालत राहील व अनेक मुली शिक्षण प्रवाहात येतील यात शंकाच नाही. एका शिक्षकाचे हे सामाजिक व शैक्षणिक आदर्शवत काम समाजाला नक्कीच प्रेरणादायक ठरेल व फुलेंची जयंती खऱ्या अर्थाने साजरी झाल्याचे समाधान वाटेल.

‘’फुले व कर्वे या महापुरूषांनी लावलेल्या स्री शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष करायचा असेल तर फक्त त्यांची जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करून चालणार नाहीत. तर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने एक वेगळे पाऊल टाकण्याची गरज आहे. आणि हीच खरी या महापुरूषांना आदरांजली ठरेल.’’

- संजीव बागुल, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक