भारतीय पोस्टामार्फत 'दीनदयाल स्पर्श योजना' सुरू, ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ

भारतीय पोस्ट विभागाकडून इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'दीनदयाल स्पर्श योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० प्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहेत.

भारतीय पोस्टामार्फत 'दीनदयाल स्पर्श योजना' सुरू, ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय पोस्ट विभागाकडून (Indian Post Department) इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी (Benefits for students of classes 6th to 9th) 'दीनदयाल स्पर्श योजना' (Deendayal Sparsh Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० प्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पोस्ट विभागाच्या स्टॅम्पचा संग्रह करून त्याला कॅटलाॅग करावा लागणार आहे. जुने स्टॅम्प शोधून त्यांचे जतन करून प्रदर्शन करणे. त्यावर अधिक संशोधन करणे, असे विविध छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली जाणार आहे. 

योजनेचा उद्देश

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पत्रव्यवहार करण्याची तसेच स्टॅम्पचा अभ्यास करून त्याचा संग्रह करण्याची आवड निर्माण होणे, हा योजनेचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तसेच, छंद म्हणून टपाल तिकिटांचा संग्रह आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी भारतातील ९२० विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड करून त्यांना वर्षाला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येतात.

योजनेविषयी थोडक्यात माहिती

प्रत्येक पोस्टल सर्कल इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दर तीन महिन्यांनी वितरित केली जाते. शिष्यवृत्तीसाठीची निवड एका वर्षासाठी असते. यापूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. शाळेमध्ये फिलाटली क्लब नसल्यास विद्यार्थ्यांचे स्वतःचे फिलाटली डिपॉझिट खाते विचारात घेतले जाते.

असा करता येणार अर्ज 

पोस्ट ऑफिसममध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड प्रत अर्जासह जोडावी. फिलाटली डिपॉझिट खात्यातील सदस्यत्वाचा तपशील आवश्यक आहे. भरलेला अर्ज पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधीक्षकांकडे जमा करावा. सोबत पोस्ट स्टॅम्पचा तयार केलेला प्रोजेक्ट जोडावा.

अर्जासाठी कोण असणार पात्र

देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा सहावी ते नववी इयत्तेतील विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सरकारी आणि खासगी दोन्ही शाळांमधील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसाठी किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून परीक्षा पास झालेला विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. एससी, एसटी श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.